कोल्हापूर : पन्हाळा गडावरील 33/11 के.व्ही. उपकेंद्रातून नावली व मिठारवाडी या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या 11 के.व्ही. वीज वाहिन्या अतिवृष्टीने झालेल्या भुस्सखलनामुळे जमिनदोस्त झाल्या होत्या. पन्हाळगडाच्या दऱ्या-खोऱ्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून उंच कड्यावर वीज खांबांची वाहतूक करून एक हजार फुट खोल दरीत त्या वीज वाहिन्या उभारण्याचे काम तडीस नेले.
पन्हाळा 33/ 11 के.व्ही. उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करणाऱ्या 11 के.व्ही. नावली गावठाण, 11 के.व्ही. मिठारवाडी गावठाण व 11 के.व्ही. मिठारवाडी शेतीपंप या तीन वाहिन्यांचे वीज खांब व वीज तारा अतिवृष्टीने झालेल्या भुस्सखलनामुळे वाहून गेले होते. सदरच्या वाहिन्यांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात 33/11 के.व्ही. केर्ले व सातवे या उपकेंद्रातून सुरु करण्यात आला होता.
पन्हाळा गडावरील भौगोलिक परिस्थिती त्यात जागेची उपलब्धता, धुके व पावसामुळे पन्हाळा 33/ 11 के.व्ही. उपकेंद्रातून निघणाऱ्या बाधित वीज वाहिन्यांची उभारणी करणे जिकीरीचे काम होते. खचलेला रस्ता, नागमोडी वळणाच्या पायवाटा, खडाचढ व पाऊस-वारा अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 500 किलो वजनाचा एक वीज खांब असे 5 वीज खांब व वीज तारांची वाहतूक केली. उंच कड्यावरील व दरीतील वीज खांब उभारुन वीज वाहिन्या ओढण्याचे काम पुर्ण केले.
अधिक्षक अभियंता श्री. अंकुर कावळे यांनी स्वत: स्थळ पाहणी करुन सदर कामाचे नियोजन केले. श्री. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर ग्रामीण विभाग 1 चे कार्यकारी अभियंता श्री. दिपक पाटील, उपकार्यकारी अभियंता श्री. अमोल राजे, सहाय्यक अभियंता सुलतान शेळके, कनिष्ठ अभियंता प्रविण पाटील, मुख्य तंत्रज्ञ श्री. वडांबे व जनमित्रांनी ही कामगिरी पार पाडली. सदर कामासाठी पन्हाळा नगरपरिषदेचे मोलाचे सहकार्य लाभले.