सेनापती कापशी, दि. २६:आपण चर काढल्यामुळेच चिकोत्रा प्रकल्प भरला अशी बालिशपणाची वक्तव्ये करून जनतेची करमणूक करू नका, असा सल्ला माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी नाव न घेता समरजीत घाटगे यांना दिला आहे. कदाचित पाऊसही माझ्यामुळेच पडला, असेही म्हणाल, असा टोलाही श्री. खोत यांनी या पत्रकात लगावला आहे.
या पावसाळ्यात चिकोत्रा प्रकल्प भरल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. घाटगे यांनी प्रकल्पाला भेट देऊन आपण चर काढल्यामुळे तो भरला, असा दावा केला होता. त्याला श्री. खोत यांनी उत्तर देताना पुढे म्हटले आहे, यावर्षी पाऊस ४०० मिलिमीटर कमी पडला असला तरी प्रकल्पात ४५ टक्के इतका शिल्लक पाणीसाठा होता. त्यामुळेच प्रकल्प तुडुंब भरला आहे. ही वस्तुस्थिती दडवून समरजीत घाटगे स्वतःचे हसे करुन घेत आहेत.
पत्रकात श्री. खोत यांनी पुढे म्हटले आहे, गेली तीन वर्षे सलग चांगला पाऊस होत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे १००% भरत आहेत. चिकोत्रा धरण ज्या- ज्या वेळी भरले नाही, त्यावेळी पाऊस कमीच पडला आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये सुद्धा १७२८ मिलिमीटर पाऊस पडून धरण भरले होते. पाऊस १७०० मिलिमीटरपेक्षा कमी व धरणामध्ये २५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असलेस धरण भरले जात नाही. कदाचित, तीन वर्षे मीच पाऊस पडला असे बालिश विधान करत जनतेची करमणूक करु नका. त्यामुळेच म, अद्याप परिपक्वपणा आला नसल्याचेच हे द्योतक आहे, असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.