कोल्हापूर, ता. १७ – पेठवडगाव येथील कुमारी किरण दिलीप राठोडने आज शिरोली येथील सीमांधर धाम येथे दीक्षा घेतली. येथून पुढे त्या कल्पसूत्र प्रभाश्रीजी या नावाने ओळखल्या जातील.
येथून पुढे त्या आई-वडिलांसह परिवाराचा त्याग तर करतीलच शिवाय साधन-संपत्तीसह मोहाचा त्याग करून व्रस्तथ जीवन जगतील. भगवान महावीर यांनी दाखविलेल्या मार्गावरून आचरण ठेवून समाजाची सेवा करण्याबरोबरच धर्मप्रसाराचे कार्य करतील.
आज रागसे वितराग की ओर म्हणजे दीक्षा विधी झाला. ही दीक्षा प.पू. आचार्य श्रीमद विजय विमलबोधी सुरीश्वर महाराजांनी प्रदान केली. कल्पसूत्र प्रभाश्रीजींच्या गुरू प.पू. साध्वी दर्शनप्रभाश्री आहेत.
दरम्यान, कुमारी किरण दिलीप राठोड (वय २५) यांच्या दीक्षा विधीसाठी आवश्यक विधींना बुधवारी सुरवात झाली. वडील सराफ व्यावसायिक, आई गृहिणी, भाऊ चार्टर्ड अकौंटंट आणि विवाहित बहीण अशा सुखवस्तू कुटुंबात जन्म घेतलेल्या किरणने बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेऊन ऐषोआरामाचे जीवन जगण्याचे न ठरविता दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कुटुंबाने संमती देऊन त्या विधीची सुरवात बुधवारी (ता. १३) सकाळी ८.३० प्रभू जन्मोत्सव आणि सायंकाळी सात वाजता गीत गायनाने झाली. गुरुवारी सकाळी आठ वाजता श्री वीर प्रभू का जन्मकल्याण होऊन त्यानंतर महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सात वाजता मुनि तारा दर्शन थी दुःख जाये हा कार्यक्रम झाला.
शुक्रवारी शिरोली येथील सीमंधर धाम येथे सकाळी ७.३० वाजता पू. गुरुभगवंतांचे आगमन झाले. ८.३० वाजता आत्मशुद्धि हेतू महाभिषेक होऊन दुपारी २.३० वाजता रंगोत्सव, छाब वधामणा, महेंदी गांव सांझी या कार्यक्रमाबरोबरच सायंकाळी ७.३० विदाई समारोहचे आयोजन केले होते.
शनिवारी सकाळी जोगी थवे न जाए महावीर या कार्यक्रमाचे आयोजन केले. सायंकाळी ६.३० वाजता महाआरती झाली. या कार्यक्रमाला किरणच्या कुटुंबीयांबरोबर मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते.
