Thursday, March 26, 2026
Home Blog

अजमल दुबईने रणवीर सिंग यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून केली घोषणा

0

कोल्हापूर, : अजमल पर्फुम्स (अजमल दुबई) यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेसोबत “युअर अनसीन पॉवर” या नव्या मोहिमेचेही लाँच करण्यात आले असून, ब्रँडच्या प्रवासात एक धाडसी नवे पर्व सुरू झाले आहे.
रणवीर सिंग त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी उपस्थितीमुळे ओळखले जातात. त्यामुळे सुगंधाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व व्यक्त करण्याच्या अजमलच्या तत्त्वज्ञानाशी त्यांची उत्तम जुळवणूक होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही मोहीम देशभरातील ५७५ हून अधिक पीव्हीआर स्क्रीनवर प्रदर्शित होत असून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
“युअर अनसीन पॉवर” या मोहिमेत अजमलचे तीन खास सुगंध—अरिस्टोक्रेट, ऑरम समर आणि विसाल लायल—यांचा समावेश आहे. अरिस्टोक्रेट हा वुडी-फ्रेश प्रकारातील परिष्कृत पुरुषी सुगंध आहे, ऑरम समर हा फ्रूटी-फ्लोरल युनिसेक्स सुगंध असून उत्साह आणि आकर्षण दर्शवतो, तर विसाल लायल हा खास क्षणांसाठी डिझाइन केलेला संवेदनशील वुडी सुगंध आहे. हे तिन्ही सुगंध आत्मविश्वास, करिष्मा आणि व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा अधोरेखित करतात.
या भागीदारीबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणाले की, अजमल दुबईचा वारसा, कौशल्य आणि सुगंधाद्वारे व्यक्तिमत्त्व व्यक्त करण्याची संकल्पना त्यांना जवळची वाटते. “ही मोहीम लोकांना त्यांच्या ‘अदृश्य शक्ती’ची जाणीव करून देते,” असे त्यांनी सांगितले.
अजमल ग्रुपचे सीईओ अब्दुल्ला अजमल यांनीही या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, रणवीर सिंग हे केवळ ब्रँडचा चेहरा नसून स्व-अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात.
दरम्यान, अजमलचे हे सुगंध भारतातील प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे

स्कोडा ऑटो इंडियाची नवीन कुशाक लाँच — “ईजी टू लव्ह” मोहिमेतून मूल्य, कामगिरी आणि सुरक्षिततेची नवी व्याख्या

0

कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडिया ने आपल्या लोकप्रिय एस यू व्ही मॉडेल कुशाक चे अद्ययावत व्हर्जन “ईजी टू लव्ह” या नव्या मोहिमेसह लाँच केले असून, किमती जाहीर करत ग्राहकांना डिलिव्हरी सुरू केल्याची घोषणा केली आहे.
यावर्षी जानेवारीमध्ये अनावरण करण्यात आलेली ही नवीन कुशाक मूल्य, सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सच्या बाबतीत नवे मापदंड निर्माण करते. युरोपियन तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सुलभ करण्याच्या ब्रँडच्या धोरणाला ही गाडी पुढे नेते.
नवीन कुशाकमध्ये पहिल्यांदाच ८-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि रिअर सीट मसाजर यांसारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. ही एस यू व्ही १.० टी एस आय आणि १.५ टी एस आय अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असून, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय ग्राहकांना मिळतात.
ही गाडी क्लासिक प्लस, सिग्नेचर, स्पोर्टलाइन, प्रेस्टीज आणि मोंटे कार्लो अशा पाच ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. तसेच, कँडी व्हाईट, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर, लावा ब्लू, डीप ब्लॅक यांसह शिमला ग्रीन, स्टील ग्रे आणि चेरी रेड अशा एकूण आठ आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता यांनी सांगितले की, “युरोपियन तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ करणे हे आमचे ध्येय आहे. नवीन कुशाकद्वारे आम्ही मूल्य, सुरक्षा आणि कामगिरी यांचा उत्तम समतोल साधत आहोत. सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेली फीचर्स आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे ही एस यु व्ही सुरुवातीपासूनच उत्कृष्ट मूल्य प्रदान करते.”
नवीन कुशाक ही ५-स्टार सुरक्षा, उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव आणि आधुनिक फीचर्ससह भारतीय ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया ; जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

0

संकल्प “पी. एम. सूर्यघर योजना” आणि “मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद/ रस्ते योजना” राबविण्याचे
कोल्हापूर, दि. २३:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गुरुवारी दि. २६ वाढदिवस होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे हा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला गडहिंग्लजचे ज्येष्ठ नेते कै. बाळासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाभर तालुकानिहाय ठरवण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन असे……
राधानगरी- ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व गुणवंतांचा सत्कार. करवीर- मातोश्री वृद्धाश्रमात फळेवाटप व सांगवडे येथे ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप. भुयेवाडी येथे शालेय साहित्य व फळे वाटप. भुदरगड- गारगोटी येथे शालेय साहित्य वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप व वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहभोजन. पन्हाळा- बाल संकुलामध्ये धान्य वाटप, कोडोली आरोग्य केंद्रामध्ये फळेवाटप व पोर्ले येथे फळेवाटप. गगनबावडा- कातळी येथे गरजूंना धान्यवाटप, धुंदवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. हातकणंगले- वडगाव उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आरोग्य शिबिर. भेंडवडे येथे शालेय साहित्याचे वाटप. इचलकरंजीतील आय. जी. एम. रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आई वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहजेवण. दक्षिण कोल्हापूर- गडमुडशिंगी येथील हॅंडीकॅप शाळेच्या मुलांना फळेवाटप. गिरगाव येथील राजर्षि शाहू महाराज वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना फळेवाटप. शिरोळ- ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप, गरजूंना धान्यवाटप व शालेय साहित्य वाटप. शाहूवाडी- बांबवडे येथे वृक्षारोपण. मलकापूर येथील अनाथ आश्रमात फळेवाटप.
माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील- बापू, केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील, संचालक रणवीरसिंह गायकवाड, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळ दूध संघाचे संचालक किसनराव चौगुले, धैर्यशील पाटील- कौलवकर, अमरसिंह माने- पाटील, बाळासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र भाटले, माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनीलराव कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजयसिंह कलिकते, करवीर तालुका अध्यक्ष शिवाजीराव देसाई, संतोष धुमाळ, संभाजी पाटील- भुयेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
संकल्प पी. एम. सूर्यघर योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना राबवण्याचे…….!
या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांनी केले. या पत्रात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, हा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करा. कुठेही डिजिटल बोर्ड, बॅनर उभा करू नका. या वाढदिवसानिमित्त घरोघरी “पी. एम. सूर्यघर योजना” आणि “मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद/ रस्ते योजना” राबविण्याचे संकल्प हाती घेणार आहोत.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांनी केले. आभार शिवाजीराव देसाई यांनी मानले.

मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांचा अभिनय असलेल्या“लग्नपंचमी”ला प्रचंड प्रतिसाद

0

महाराष्ट्र : मराठी रंगभूमीवरची सर्जनशील, बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन-दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका असलेल्या ‘लग्नपंचमी’ला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दोन महिन्यात त्याचे २५ प्रयोग झालेसुद्धा. या रजतमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्त्ताने मराठी भाषा गौरव दिनी या नाटकाच्या निर्मात्यांनी नाटकाचा ‘वर्ल्ड टूर’ अर्थात परदेश दौरा जाहीर केला असून तो अशाप्रकारचा मराठी नाटकाचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.
या दौऱ्याविषयीचा आणखी तपशील लवकरच जाहीर होणार असून, या घोषणेनंतर नाटकाबद्दल जगभरातील मराठी रसिकांमध्ये औस्तुक्य लागून राहिले आहे.फ्लिक्स प्ले एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे यतीन पाटील यां निर्मात्या कंपनीचे यतीन पाटील यांनी या नाटकाच्या आजच्या पंचविसाव्या प्रयोगाच्यावेळी ही घोषणा केली. या नाटकाचा पंचविसावा प्रयोग मराठी भाषा गौरव दिनी रवींद्र नाट्य मंदिर येथे हाउस फुल गर्दीत झाला.
या परदेश दौऱ्यात ‘लग्नपंचमी’चे प्रयोग अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया- आणि-न्यूझीलंड, आशिया खंडातील देश, मध्यपूर्व देश तसेच युरोपसह युनायटेड किंग्डम येथे आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात इतक्या व्यापक स्तरावर विविध खंडांमध्ये एकत्रित दौऱ्याची घोषणा होणे ही अभिमानाची बाब मानली जात असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली.
परदेश दौऱ्याची घोषणा करताना, यतीन पाटील म्हणाले की, अशाप्रकारचा मराठी नाटकाचा हा पहिला दौरा असणार आहे. “बॉलीवूडच्या कार्यक्रमांचा दौरा होतो तेव्हा जगभरात होणाऱ्या सर्व शोंची घोषणा एकत्र होते. मराठी नाटकांच्या किंवा कार्यक्रमांच्या बाबतीत तसे होत नाही. जगभरातील प्रयोग एकाच
वेळी जाहीर होत नाहीत.‘लग्नपंचमी’च्या बाबतीत आम्ही ते करणार आहोत ,” असे यतीन पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “माझे स्ट्रॅटेजी पार्टनर “दि आयडियाज” त्यांचेही त्यासाठी खूप खूप आभार. तुम्हा रसिकांचा प्रतिसाद मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मिळाला. तसाच तो परदेशांमधील प्रयोगांनाही मिळेल याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परदेशातील प्रयोगांची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. तुम्हीही पुढील घोषणेची वाट पहा. ‘लग्नपंचमी’च्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मिक्सबॉक्स इंटरटेन्मेंट या पेजला भेट द्यायला विसरू नका.”
या नाटकाचा निर्माता आणि मध्यवर्ती भूमिकेतील कलाकार स्वप्नील जोशी म्हणाले की निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्यासाठी आजचा क्षण अत्यंत मोलाचा आहे. “मराठी भाषा गौरव दिनी नाटकाचा पंचविसावा प्रयोग होत आहे, हा नटराजाचा आशीर्वाद आहे आणि सर्वांसाठीच दुग्ध-शर्करा योग आहे. विक्रमी वेळेत आम्ही या नाटकाचे पंचवीस प्रयोग केले आहेत. आम्हालाही माहित नव्हते पण प्रेक्षकांनीच हे आमच्या ध्यानात आणून दिले. कोणत्याही कलाकारासाठी, निर्मात्यासाठी ही अत्यंत आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याचवेळी परदेश दौऱ्याची केलेली घोषणाही उत्साह, हुरूप वाढविणारी आहे. आनंद आणि अभिमानाबरोबरच आज उर भरून आला आहे,” ते म्हणाले.
नाटकातील मध्यवर्ती भूमिकेत असलेली आणि नाटकाची एक निर्माती असलेली अमृता खानविलकर म्हणाली, “मी इथे अभिनेत्री आहे आणि निर्मातीही आहे. या नाटकाच्या यशाने मला जो आनंद झाला आहे, तो शब्दांत सांगणे कठीण आहे.”
नाटकाची लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणाली, “हे नाटक सर्व वयोगटांचे, कुटुंबाचे, विनोदाचे आहे आणि त्याहीवर महत्वाचे म्हणजे ते रसिक प्रेक्षकांचे आहे. या नाटकाला रसिकांकडून एवढा प्रतिसाद मिळेल असे मला ते लिहिताना वाटले नव्हते.या नाटकाचे यश हे आमच्या दिग्दर्शकाप्रमाणे निर्माते, कलाकार यांचेही आहे. पण हे नाटक सर्वात महत्वाचे म्हणजे ते डोक्यावर घेणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे आहे.”
घोषणेपासूनच मराठी नाट्यसृष्टीत प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाचा शुभारंभ जानेवारीत झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे सर्वदूर २५ प्रयोग झाले आहे. सातारा, सांगलीपासून कोथरूड, पुणे आणि मुंबईतील प्रेक्षकांनी या नाटकाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

लहान हातांनी साकारलेल्या मोठ्या स्वप्नांची २२ वर्षे – युवा मास्टरस्ट्रोक २०२५

0

~ ६,६०० शाळांमधील केजी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या छोट्या कलाकारांनी सर्जनशीलतेला सीमा नसल्याचे केले सिद्ध ~
कोल्हापूर: नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या युवातर्फे आयोजित ‘युवा मास्टरस्ट्रोक’च्या २२व्या पर्वाची यशस्वी सांगता झाली. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत या अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नर्सरीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने चित्रकलेच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि विचार व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.
दोन दशकांहून अधिक काळापूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आज एका सर्जनशील चळवळीत परिवर्तित झाला आहे. २०२५च्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतभरातील ६,६००हून अधिक शाळांमधील २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला. केवळ प्रतिभेचा गौरव करणे इतकेच या उपक्रमाचे उद्दिष्ट नसून, कलेच्या या सर्वांना समजणाऱ्या माध्यमातून विद्यार्थी गुंतागुंतीचे विचार आणि भावना व्यक्त करण्यास चालना देणारी संस्कृती घडवण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.
सहभागींचे तीन वयोगटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते –

● गट अ : केजी ते इयत्ता तिसरी
● गट ब : इयत्ता चौथी ते इयत्ता सहावी
● गट क : इयत्ता सातवी ते इयत्ता दहावी

युवा मास्टरस्ट्रोक २०२५ या स्पर्धेच्या प्रत्येक वयोगटातील विजेत्यांची नावे https://masterstroke.navneet.com/ या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहेत.
श्री. भारत पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय प्रवेशिकांचे परीक्षण करण्यात आले. जे. जे. कला महाविद्यालयाची पार्श्वभूमी आणि कला क्षेत्रातील अनेक दशकांचा अनुभव असलेल्या श्री. पार्टे यांनी चित्रकृतींचे परीक्षण केले आणि या स्पर्धेचा एकूण उत्साह अधिक उंचावला.
विजेत्यांनी आपापल्या विभागांत कल्पकतेचा सर्वोच्च बिंदू असल्याचे अधोरेखित केले. या गुणवान विद्यार्थ्यांपर्यंत बक्षिसे व अधिकृत मानपत्रे पोहोचावी, यासाठी युवातर्फे शाळा व्यवस्थापन व स्थानिक सेल्स टीमसोबत काम करण्यात येत आहे. आतापर्यंत ४०,००० विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर मिळाले आहेत.
जिल्हास्तरीय फेऱ्या खास महाराष्ट्र व गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक शाळेतील आघाडीच्या प्रवेशिकांचे काटेकोर परीक्षण केरून युवातर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक गटातून एका विजेत्याची निवड करण्यात आली.
युवाचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले, “मास्टरस्ट्रोक ही कल्पकतेची अभिमानास्पद अभिव्यक्ती आहे. या वर्षी या प्रवासात ६,६००हून अधिक शाळा सहभागी झाल्या आणि त्यांचा उत्साह अतुलनीय होता. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ चित्रकलेचा महोत्सव साजरा करत आहोतच, त्याचप्रमाणे पुढील पिढीचे विचारवंत, भविष्याची स्वप्ने पाहणारे आणि कलाकार घडवत आहोत.

९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास, मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

0

डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केले
डोंबिवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. या आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी हा रेकॉर्ड केला. त्यावेळी स्वप्नील डांगरेकर यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट व मेडल हस्तांतरीत केले.
त्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानत लेझीम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षी शारीरिक व्यायामावर भर देऊन जगासमोर सशक्त भारत कसा असू शकतो हे दाखवून देण्याचा संकल्प सोडला होता, त्या निमित्ताने महिला आणि विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला याचा मला डोंबिवलीकर म्हणून प्रचंड आनंद आहे, हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले. कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीचे त्यांनी आभार मानले. शिक्षक, विद्यार्थी आदींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सारा आसमंत भारत माता की जय, जय श्रीराम, वंदे मातरमने दणाणून सोडला होता. प्रत्येकाच्या चेहऱयावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. लेझीमचा झुंकार सर्वत्र निनादत होता, ढोल ताशांच्या गजरात त्या रेकॉर्डचे हजारो डोंबिवलीकरांनी स्वागत केले, आणि प्रत्येकाच्या सहभागाबद्दल कौतुक करण्यात आले. अशा दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पहाटेपासून डोंबिवलीकर प्रतीक्षेत होता, अखेर वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा होताच प्रचंड जल्लोषात त्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

0

समूहाच्या या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील गजबजलेल्या व्यापारी व कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली उणीव भरून निघणार
सांगली, : पश्चिम महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घडामोडीत सयाजी हॉटेल्सने आपल्या ‘एफोटेल’ ब्रँडअंतर्गत ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ या नव्या हॉटेलच्या सुरूवातीची घोषणा केली आहे. सांगली–मिरज रोडवरील शिव आर सिटी मॉलमध्ये धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले हे हॉटेल सांगली शहरात सयाजी समूहाचा ठळक आणि योग्य वेळी झालेला प्रवेश दर्शवते. व्यापारी व कृषी क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार ब्रँडेड निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली कमतरता लक्षात घेता, ही नवीन सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
या नव्या हॉटेलच्या समावेशामुळे ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ हे महाराष्ट्रातील ‘एफोटेल’ ब्रँडचे तिसरे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सरोला आणि नवी मुंबई येथील हॉटेल्स त्याच्या सिस्टर प्रॉपर्टीज् आहेत. या विस्तारातून सयाजी समूहाची महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक बळकट होत असून टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मध्यम-उच्च दर्जाची आदरातिथ्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करते.
एफोटेल बाय सयाजी, सांगली येथे एकूण ५९ सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अतिथी कक्ष/ रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत : १५ ग्रँड रूम्स (२८४ चौ. फूट), ३४ प्रीमियम ग्रँड रूम्स (३०९ चौ. फूट), ६ एक्झिक्युटिव्ह ग्रँड रूम्स (३७३ चौ. फूट), २ ग्रँड सूट्स (५०६ चौ. फूट) आणि २ प्रीमियम सूट्स (७६६ चौ. फूट). व्यवसायिक प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे.
या हॉटेलमधील भोजन व्यवस्था हीदेखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. येथे दोन वेगवेगळे फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्स उपलब्ध आहेत—‘द क्यूब’, १२० आसन क्षमतेचे दिवसभर सुरू असलेले डायनिंग रेस्टॉरंट आणि ‘गुड ओल्ड डेज’, ३० पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे.
या हॉटेलमध्ये ‘जार्डिन १’ आणि ‘जार्डिन २’ असे दोन बहुउपयोगी बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. ‘जार्डिन १’ सुमारे ४,२९५ चौ. फूट क्षेत्रफळाचा असून थिएटर पद्धतीच्या आसन व्यवस्थेत ३५० पाहुण्यांपर्यंत क्षमता आहे. तर ‘जार्डिन २’ चे क्षेत्रफळ २,३५५ चौ. फूट असून त्यात थिएटर पद्धतीने १५० पाहुण्यांची व्यवस्था करता येते. या सुविधांमुळे एफोटेल बाय सयाजी, सांगली हे शहरातील एमआयसीई (मीटिंग्स, इन्सेंटिव्ह्स, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स) तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले प्रमुख ठिकाण ठरणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सांगलीमध्ये उच्च दर्जाच्या बँक्वेट सुविधांची कमतरता असल्याने ही सुविधा शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर; आय. टी. क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्रांना कोल्हापुरातच मिळणार रोजगार

0

मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांचे विशेष प्रयत्न
मुंबई, :शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले. दिवंगत लोकनेते कै. अजितदादा पवार यांनीही आय. टी. पार्कच्या पूर्ततेसाठी दोन बैठका घेतल्या होत्या.
याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या प्रस्तावाच्या मंत्रिमंडळ मंजुरीमुळे ही जागा आता उद्योग विभागाला दिली जाणार आहे. या विभागामार्फत मोठ- मोठे प्रकल्प आणले जातील. या आयटी पार्कमध्ये मोठ मोठ्या कंपन्या येण्यासाठी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्राताई पवार वहिनी, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील लाखो आय. टी. क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुणे बेंगलोर मुंबई हैदराबादसह अमेरिका या अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. या आयटी पार्कमुळे आय. टी. क्षेत्रातील भूमिपुत्र तरुण-तरुणींना स्थानिकला कोल्हापूरमध्येच रोजगार उपलब्ध होईल. आत्ता कोल्हापूर विमानतळ आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनही सर्व सोयी आणि सेवा-सुविधांनी युक्त आहे. आयटी पार्कसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयीसुविधा आता कोल्हापुरातच निर्माण झालेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरातील गट नंबर 583, 587 व 588 मधील एकूण 36 हेक्टर 36 गुंठे जमीन प्रथमता महसूल विभागाकडे समर्पित करण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव आहे. त्यानंतर महसूल विभागाकडे समर्पित केलेल्या 36 हेक्टर, 36 गुंठे जमिनीपैकी 34 हेक्टर 36 गुंठे जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आयटी पार्क विकसित करण्यासाठी हस्तांतरित करावी. या जमिनीची कृषिक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परीगणित केलेली संपूर्ण रक्कम वसूल करून भोगवटादार वर्ग- दोन या धारणाधिकाराने कब्जे हक्काने प्रदान करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात यावा, अशी मागणी प्रस्तावात नमूद केली आहे.
शेंडा पार्कातील ही जागा मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असून आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आणि शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत. जवळच शिवाजी विद्यापीठ आणि अन्य नामांकित संस्थाही असल्यामुळे कुशल मनुष्यबळही सहज उपलब्ध होणार आहे. या जागे लगतच २५ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि २५ एकर जागेवर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ प्रस्तावित असून नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

0

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने, कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. सध्याच्या महागाईच्या दिवसात पुरूषांच्याबरोबरीने महिलांनी उद्योग- व्यवसाय सुरू करत कुटूंबाला हातभार लावावा, यासाठी भागीरथी महिला संस्था प्रयत्नशिल आहे. महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून, आर्थिकदृष्टया सक्षम बनावे, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले.
भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील महिलांसाठी, मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. भागीरथीच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, नगरसेविका पुर्वा राणे, अर्चना कोराणे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरवात झाली. भागीरथी संस्थेने आजवर २५ ते ३० हजार महिलांना उद्योगशील बनवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह, भागीरथी पतसंस्थेच्यावतीने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भागीरथी संस्था प्रयत्न करते. आजवर शेकडो महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत. यापुढेही महिला सक्षमीकरणाची चळवळ कायम सुरू असेल, असे अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. त्यानंतर अश्‍विनी वास्कर यांनी महिलांना नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर, सेंट, साबण, अगरबत्ती, केक, चौपाटी पदार्थ अशा विविध पदार्थांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तर नगरसेविका पुर्वा राणे यांनीही उपस्थित महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी नम्रता देसाई, प्रज्ञा इंगवले यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणी

0

भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेतली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, सदस्य नोंदणी केली जाणार आहे. तसेच नजीकच्या काळातील विविध उपक्रमांची आखणी करून, पक्षीय कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली आहे. कृष्णराज महाडिक यांनी आपल्या पक्षाच्या कामकाजाला प्रारंभ केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात कृष्णराज यांनी भाजप युवा मोर्चाची जिल्हा स्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विश्‍वजीत पवार, प्रशांत घुगले, रविश पाटील-कौलवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी येत्या काही दिवसात, युवा मोर्चाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये युवा मोर्चाची कार्यकारिणी आणि संघटनात्मक बांधणी बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. शिस्तबध्द पक्ष या भाजपच्या प्रतिमेला तडा जाता कामा नये, असे सांगून राज्यात किमान एक लाख युवा सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये १५ ते २० हजार सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट कोल्हापूर जिल्हयाला देण्यात आले. युवतींसाठी युवा मोर्चाचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, रोजगार आणि क्रीडा कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, अशा त्यांनी सुचना केल्या. तसेच येत्या मे महिन्यात युवा आघाडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम कोल्हापुरात घेण्यात येईल. त्याचे नियोजन मार्च महिन्यापासून केले जाईल, असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पवार यांनी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल, असा शब्द प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना दिला. विरोधकांकडून नेहमीच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात खोटे नरेटीव्ह सेट केले जाते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत भुगले यांनी दिला. नूतन युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात युवा शाखा उघडण्यात येतील. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष रविश पाटील-कौलवकर यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीमुळे कार्यकर्ते-पदाधिकारी चार्ज झाल्याचे दिसून आले. यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते