समूहाच्या या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील गजबजलेल्या व्यापारी व कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली उणीव भरून निघणार
सांगली, : पश्चिम महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घडामोडीत सयाजी हॉटेल्सने आपल्या ‘एफोटेल’ ब्रँडअंतर्गत ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ या नव्या हॉटेलच्या सुरूवातीची घोषणा केली आहे. सांगली–मिरज रोडवरील शिव आर सिटी मॉलमध्ये धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले हे हॉटेल सांगली शहरात सयाजी समूहाचा ठळक आणि योग्य वेळी झालेला प्रवेश दर्शवते. व्यापारी व कृषी क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार ब्रँडेड निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली कमतरता लक्षात घेता, ही नवीन सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
या नव्या हॉटेलच्या समावेशामुळे ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ हे महाराष्ट्रातील ‘एफोटेल’ ब्रँडचे तिसरे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सरोला आणि नवी मुंबई येथील हॉटेल्स त्याच्या सिस्टर प्रॉपर्टीज् आहेत. या विस्तारातून सयाजी समूहाची महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक बळकट होत असून टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मध्यम-उच्च दर्जाची आदरातिथ्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करते.
एफोटेल बाय सयाजी, सांगली येथे एकूण ५९ सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अतिथी कक्ष/ रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत : १५ ग्रँड रूम्स (२८४ चौ. फूट), ३४ प्रीमियम ग्रँड रूम्स (३०९ चौ. फूट), ६ एक्झिक्युटिव्ह ग्रँड रूम्स (३७३ चौ. फूट), २ ग्रँड सूट्स (५०६ चौ. फूट) आणि २ प्रीमियम सूट्स (७६६ चौ. फूट). व्यवसायिक प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे.
या हॉटेलमधील भोजन व्यवस्था हीदेखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. येथे दोन वेगवेगळे फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्स उपलब्ध आहेत—‘द क्यूब’, १२० आसन क्षमतेचे दिवसभर सुरू असलेले डायनिंग रेस्टॉरंट आणि ‘गुड ओल्ड डेज’, ३० पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे.
या हॉटेलमध्ये ‘जार्डिन १’ आणि ‘जार्डिन २’ असे दोन बहुउपयोगी बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. ‘जार्डिन १’ सुमारे ४,२९५ चौ. फूट क्षेत्रफळाचा असून थिएटर पद्धतीच्या आसन व्यवस्थेत ३५० पाहुण्यांपर्यंत क्षमता आहे. तर ‘जार्डिन २’ चे क्षेत्रफळ २,३५५ चौ. फूट असून त्यात थिएटर पद्धतीने १५० पाहुण्यांची व्यवस्था करता येते. या सुविधांमुळे एफोटेल बाय सयाजी, सांगली हे शहरातील एमआयसीई (मीटिंग्स, इन्सेंटिव्ह्स, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स) तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले प्रमुख ठिकाण ठरणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सांगलीमध्ये उच्च दर्जाच्या बँक्वेट सुविधांची कमतरता असल्याने ही सुविधा शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार
शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर; आय. टी. क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्रांना कोल्हापुरातच मिळणार रोजगार
मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांचे विशेष प्रयत्न
मुंबई, :शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले. दिवंगत लोकनेते कै. अजितदादा पवार यांनीही आय. टी. पार्कच्या पूर्ततेसाठी दोन बैठका घेतल्या होत्या.
याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या प्रस्तावाच्या मंत्रिमंडळ मंजुरीमुळे ही जागा आता उद्योग विभागाला दिली जाणार आहे. या विभागामार्फत मोठ- मोठे प्रकल्प आणले जातील. या आयटी पार्कमध्ये मोठ मोठ्या कंपन्या येण्यासाठी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्राताई पवार वहिनी, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील लाखो आय. टी. क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुणे बेंगलोर मुंबई हैदराबादसह अमेरिका या अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. या आयटी पार्कमुळे आय. टी. क्षेत्रातील भूमिपुत्र तरुण-तरुणींना स्थानिकला कोल्हापूरमध्येच रोजगार उपलब्ध होईल. आत्ता कोल्हापूर विमानतळ आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनही सर्व सोयी आणि सेवा-सुविधांनी युक्त आहे. आयटी पार्कसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयीसुविधा आता कोल्हापुरातच निर्माण झालेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरातील गट नंबर 583, 587 व 588 मधील एकूण 36 हेक्टर 36 गुंठे जमीन प्रथमता महसूल विभागाकडे समर्पित करण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव आहे. त्यानंतर महसूल विभागाकडे समर्पित केलेल्या 36 हेक्टर, 36 गुंठे जमिनीपैकी 34 हेक्टर 36 गुंठे जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आयटी पार्क विकसित करण्यासाठी हस्तांतरित करावी. या जमिनीची कृषिक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परीगणित केलेली संपूर्ण रक्कम वसूल करून भोगवटादार वर्ग- दोन या धारणाधिकाराने कब्जे हक्काने प्रदान करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात यावा, अशी मागणी प्रस्तावात नमूद केली आहे.
शेंडा पार्कातील ही जागा मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असून आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आणि शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत. जवळच शिवाजी विद्यापीठ आणि अन्य नामांकित संस्थाही असल्यामुळे कुशल मनुष्यबळही सहज उपलब्ध होणार आहे. या जागे लगतच २५ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि २५ एकर जागेवर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ प्रस्तावित असून नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने, कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. सध्याच्या महागाईच्या दिवसात पुरूषांच्याबरोबरीने महिलांनी उद्योग- व्यवसाय सुरू करत कुटूंबाला हातभार लावावा, यासाठी भागीरथी महिला संस्था प्रयत्नशिल आहे. महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून, आर्थिकदृष्टया सक्षम बनावे, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले.
भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील महिलांसाठी, मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. भागीरथीच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, नगरसेविका पुर्वा राणे, अर्चना कोराणे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरवात झाली. भागीरथी संस्थेने आजवर २५ ते ३० हजार महिलांना उद्योगशील बनवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह, भागीरथी पतसंस्थेच्यावतीने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भागीरथी संस्था प्रयत्न करते. आजवर शेकडो महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत. यापुढेही महिला सक्षमीकरणाची चळवळ कायम सुरू असेल, असे अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. त्यानंतर अश्विनी वास्कर यांनी महिलांना नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर, सेंट, साबण, अगरबत्ती, केक, चौपाटी पदार्थ अशा विविध पदार्थांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तर नगरसेविका पुर्वा राणे यांनीही उपस्थित महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी नम्रता देसाई, प्रज्ञा इंगवले यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.
भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणी
भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेतली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, सदस्य नोंदणी केली जाणार आहे. तसेच नजीकच्या काळातील विविध उपक्रमांची आखणी करून, पक्षीय कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली आहे. कृष्णराज महाडिक यांनी आपल्या पक्षाच्या कामकाजाला प्रारंभ केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात कृष्णराज यांनी भाजप युवा मोर्चाची जिल्हा स्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विश्वजीत पवार, प्रशांत घुगले, रविश पाटील-कौलवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी येत्या काही दिवसात, युवा मोर्चाच्या वतीने राबवण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये युवा मोर्चाची कार्यकारिणी आणि संघटनात्मक बांधणी बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. शिस्तबध्द पक्ष या भाजपच्या प्रतिमेला तडा जाता कामा नये, असे सांगून राज्यात किमान एक लाख युवा सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये १५ ते २० हजार सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट कोल्हापूर जिल्हयाला देण्यात आले. युवतींसाठी युवा मोर्चाचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, रोजगार आणि क्रीडा कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, अशा त्यांनी सुचना केल्या. तसेच येत्या मे महिन्यात युवा आघाडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम कोल्हापुरात घेण्यात येईल. त्याचे नियोजन मार्च महिन्यापासून केले जाईल, असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पवार यांनी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल, असा शब्द प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना दिला. विरोधकांकडून नेहमीच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात खोटे नरेटीव्ह सेट केले जाते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत भुगले यांनी दिला. नूतन युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात युवा शाखा उघडण्यात येतील. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष रविश पाटील-कौलवकर यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीमुळे कार्यकर्ते-पदाधिकारी चार्ज झाल्याचे दिसून आले. यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते
गौतम अदाणी यांनी पूर्व भारतातील महत्त्वाच्या वीज गुंतवणुकींचा आढावा घेतला; लोककेंद्रित बांधिलकीचा पुनरुच्चार
अहमदाबाद,: अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री गौतम अदाणी यांनी रविवारी झारखंड आणि बिहारमधील प्रकल्प स्थळांना भेट देत पूर्व भारतातील महत्त्वाच्या वीज गुंतवणुकींचा आढावा घेतला. खनिज संपत्तीने समृद्ध असूनही दीर्घकाळ औद्योगिकदृष्ट्या मागे राहिलेल्या या प्रदेशात अदाणी समूहाची वाढती उपस्थिती या गुंतवणुकीतून अधोरेखित होते.
झारखंडमधील आदिवासीबहुल गोड्डा येथे श्री अदाणी यांनी १,६०० मेगावॅट क्षमतेच्या अल्ट्रा-सुपरक्रिटिकल तापीय वीज प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेतला. १६,००० कोटी रुपये गुंतवणुकीत उभारलेल्या या प्रकल्पामुळे हजारो थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले असून प्रदेशातील रेल्वे संपर्क सुधारण्यास मदत झाली आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज दीर्घकालीन कराराअंतर्गत केवळ बांग्लादेशला पुरवली जाते, ज्यामुळे या प्रकल्पाला सीमापार आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेजारच्या बिहार राज्यातही श्री अदाणी यांनी भेट दिली. भागलपूरजवळील पिरपैंती येथे नियोजित २,४०० मेगावॅट अल्ट्रा-सुपरक्रिटिकल वीज प्रकल्पात २७,००० कोटी रुपये गुंतवणूक प्रस्तावित असून पुढील चार ते पाच वर्षांत तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. राज्यातील वाढत्या औद्योगिक व शहरी वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांमुळे झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये, जेथे नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असतानाही मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचे प्रमाण मर्यादित राहिले आहे, अदाणी समूह हा सर्वात मोठ्या खाजगी पायाभूत सुविधा गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून उदयास येत आहे.
या भेटीदरम्यान श्री अदाणी यांनी गोड्डा प्रकल्पातील अभियंते, तंत्रज्ञ आणि अग्रपंक्तीतील कामगारांशी संवाद साधला. तसेच परिसरातील आदिवासी महिलांची भेट घेऊन समूहाचा लोककेंद्रित दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला.
यापूर्वी दिवसभराच्या दौऱ्यादरम्यान श्री अदाणी यांनी देवघर येथील बाबा बैद्यनाथ मंदिरात दर्शन घेतले. ही दीर्घकाळ मनात असलेली वैयक्तिक इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. सेवा हीच साधना आहे या त्यांच्या श्रद्धेचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. अलीकडील काळात श्री अदाणी आणि अदाणी समूह यांनी महाकुंभ मेळा तसेच प्रभू जगन्नाथ रथयात्रा (प्रयागराज आणि पुरी) यांसारख्या मोठ्या आध्यात्मिक व सार्वजनिक उपक्रमांशीही स्वतःला जोडले आहे, ज्यातून श्रद्धा, सेवा आणि विकास एकत्र नांदू शकतात हा विचार अधिक दृढ केला आहे.
इरेझ द लर्निंग गॅप या मोहिमेद्वारे पी अँड जी शिक्षा ची 1 कोटी उत्तरं
महाराष्ट्र,: पी अँड जी शिक्षा ने आज जाहीर केले की #इरेझ द लर्निंग गॅप या आपल्या ध्येयांतर्गत भारतभरातील 1 कोटी मुलांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर सकारात्मक परिणाम साधण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी देशातील मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान बळकट करण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. भारतातील वर्गखोल्यांमध्ये अनेकदा शांततेत घडणारे क्षण — एखादे मूल एखादा परिच्छेद वाचताना थांबणे, एखादी संकल्पना न समजणे, हात वर करण्यास संकोच करणे — दुर्लक्षित राहतात. अशा क्षणांची संख्या लाखोंमध्ये गेली की समस्येची व्याप्ती स्पष्ट होते. हा टप्पा केवळ संख्येचा नाही, तर त्या प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक शिक्षणप्रवासाचे प्रतीक आहे — ज्यामुळे तात्पुरत्या शैक्षणिक अडचणी मुलांच्या आत्मविश्वासावर किंवा भविष्यातील क्षमतेवर परिणाम करत नाहीत.
या महत्त्वपूर्ण टप्प्याविषयी बोलताना रजत ब्रार, सीनियर डायरेक्टर – ब्रँड ऑपरेशन्स – पी अँड जी इंडिया म्हणाले, “74% पालक लहानपणीच्या शिकण्यातील अडचणींना फक्त एक टप्पा म्हणून पाहतात आणि त्यामुळे मुलांच्या भविष्यातील दीर्घकालीन धोक्यांकडे दुर्लक्ष होते — हे स्पष्ट दाखवते की शिकण्यातील उणिवा अनेकदा नजरेआड राहतात आणि त्यावर उपाययोजना होत नाहीत. त्यामुळेच पी अँड जी शिक्षा ने 1 कोटी मुलांपर्यंत पोहोचण्याचा टप्पा गाठणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केवळ व्यापक प्रमाणाबद्दल नाही — तर 1 कोटी अशा क्षणांचे प्रतिनिधित्व करते, जिथे योग्य वेळी दिलेल्या संरचित पाठिंब्यामुळे आत्मविश्वास पुनर्स्थापित झाला आणि मूलभूत शिक्षण अधिक बळकट झाले. लवकर.”
भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपशी जोडणार, युवा मोर्चाचे संघटन मजबूत करणार, कृष्णराज महाडिक यांंची माहिती
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक येथे प्रचंड गर्दी झाली होती. महाराणी ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत भव्य रॅली काढून कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे फोटो असलेले फलक आणि भाजपाचा ध्वज हातात घेतलेल्या तरूणाईमध्ये सळसळता उत्साह होता. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपाशी जोडण्यात येईल आणि भाजप युवा मोर्चाचे संघटन राज्यात मजबुत करणार असल्याचे युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नमुद केले. रॅलीनंतर भाजप जिल्हा कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्हयातील कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती.
युथ आयकॉन आणि कोल्हापूरचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली आहे. राज्यस्तरावरील प्रदेशाध्यक्षासारखं महत्वाचे पद कोल्हापुरला मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे आज दुपारपासून भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईचे जथ्थे ताराराणी चौकाच्या दिशेने येत होते. छत्रपती ताराराणी चौक कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. सायंकाळी पाच वाजता कृष्णराज महाडिक यांचे छत्रपती ताराराणी चौकात आगमन झाले. महापौर रूपाराणी निकम यांनी कृष्णराज महाडिक यांचे स्वागत केले. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळयाला अभिवादन करून, रॅलीला सुरवात झाली. सजवलेल्या वाहनावर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. भाजपचे ध्वज आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो असलेले फलक हातात घेवून भाजप आणि कृष्णराज महाडिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बी न्यूज कॉर्नर मार्गे रॅली व्हिनस कॉर्नर चौकात आली. याठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयाला फुलं अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आईसाहेब महाराज पुतळा मार्गे ही रॅली बिंदू चौकात आली. बिंदू चौकातील शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी कृष्णराज महाडिक यांचे औक्षण केले. तसेच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीत चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, देवराज बारदेस्कर, महेश पाटील, चंद्रकांत घाटगे, संग्राम निकम, महेश वासुदेव, राजसिंह शेळके यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी तसंच युवा मोर्चाचे राज्यभरातील आणि जिल्हयातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
एकच चर्चा… युवा मोर्चा…, कृष्णराज महाडिक यांचा विजय असो, यासह विविध घोषणा देत या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषी समारोप झाला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेला होता. माजी नगरसेवक किरण शिराळे, नगरसेवक विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. त्यामध्ये प्रीतम शिराळे, मंगेश नरोटे, अमित मंडपे, गौतम झाड, संदीप खाडे, सचिन रोटे, सागर धुमाई, वृषाली शिराळे, अस्मिता शिराळे, प्रणाली बावडेकर, शीतल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या पुष्पवृष्टीत सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाडिक आणि भाजपचा जयघोष केला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे स्वागत आज ठिकठिकाणी जल्लोषात झाले. स्टेशन रोडवरून ही रॅली पुढे आली. तिथे नगरसेविका निलिमा पाटील, शैलेश पाटील, तसेच भाजपा शाहुपूरी कोअर कमिटी सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून गोकुळ हॉटेल कॉर्नरला रॅलीचे जल्लोषी स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्यांना आणि नागरिकांना सहा हजार पाण्याच्या बाटल्या, कोकम सरबत, आंबा बर्फीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात आगमन झाले. येथे त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावतीने जल्लोषी स्वागत झाले. एकच चर्चा.. युवा मोर्चा… या घोषणांनी भाजप कार्यालय आणि परिसर दुमदुमून गेला. दरम्यान कृष्णराज महाडिक यांचे स्वागत करताना त्यांना विठ्ठलाची प्रतिमा दिली. तसेच वारकरी वेश परिधान करायला लावला. गळयात तुळशी हार घातला. काहींनी शाल, काहींनी बुके, तर काहींनी गुलाबपुष्प देवून कृष्णराज महाडिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यालयात भाजप प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते तानाजी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चौगले, नररसेवक विजय जाधव, राजसिंह निंबाळकर, नाथाजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पोवार, रवीश पाटील, प्रशांत बुगले, ऍड. संपतराव पवार, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, अनुप देसाई, समयश्री कुमार अय्यर, डॉ. सदानंद राजवर्धन, शंतनू मोहिते, ओमवीर महाडिक, जयेश घरपणकर, अवधुत अपराध, सुधीर राणे यासोबतच मोहळ, सांगोला, पळूज, सिकंदर टाकळी इथले सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकार्यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
तत्पूर्वी भाजप युवा मोर्चाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या आठवड्यात सर्वानुमते निवड केली. त्यानंतर आज कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात आगमन झाले. दुपारी ३ वाजता रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्यावतीने कृष्णराज यांचे हृदयस्पर्शी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करत औक्षणासह, मिठाई भरवून कृष्णराज यांचे महाडिक परिवाराकडून स्वागत करण्यात आले. या छोटेखानी स्वागत कार्यक्रमामुळे महाडिक परिवारामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी राज्यातील भाजप पक्ष संघटनात्मक कार्यकारिणी गेल्या आठवड्यात जाहीर केली. त्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची निवड केली. मान दिलेल्या शब्दांचा, अभिमान युवा नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा आणि जल्लोष कार्यकर्त्यांचा असंच पक्षाच्या या निवडीचे वर्णन करता येईल. कृष्णराज महाडिक यांच्या निवडीने राज्यातील युवा वर्गात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीनंतर गेले आठवडाभर कृष्णराज महाडिक पक्षाच्या कामानिमित्त मुंबईतच थांबून होते. आज त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. दुपारी ३ वाजता कृष्णराज यांचे त्यांच्या रुईकर कॉलनी इथल्या निवासस्थानी आगमन होताच, कुटुंबिय आनंदित झाले. फटाक्यांची आतषबाजी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आई सौ. अरुंधती महाडिक, आजी श्रीमती शकुंतला महाडिक, मंगल महाडिक यांच्यासह परिवाराने कृष्णराज यांचे औक्षण केले. गुलाब पुष्पांचा वर्षाव करत, मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी कृष्णराज यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. कृष्णराज यांना घट्ट आलिंगन देत कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या या स्वागत सोहळ्याने कृष्णराज महाडिक भारावून गेले होेते. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन पक्षाने आपल्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी आपण कृतीतून सिध्द करुन दाखवू, असा निर्धार कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवला. राज्यात १८ ते २८ वयोगटातील युवा वर्गाची संख्या मोठी आहे. या युवाशक्तीला राजकारण, समाजकारणात आपण सक्रीय सहभागी करुन घेणार आहे. सुमारे १ लाख युवा कार्यकर्त्यांना भाजप युवा मोर्चाशी जोडण्याचा आपला संकल्प असून, त्यातून एक सक्षम युवा महाराष्ट्राची बांधणी करणार असल्याचा मनोदय कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.
येत्या ५ वर्षात युवा वर्गासाठी आपले सामाजिक व्हीजन मोठे आहे. त्यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांची राज्य सभेवर निवड झाल्यानंतर महाडिक कुटुंबियात जे आनंदी वातावरण होते, त्याचे आनंदी वातावरणाची प्रचिती आज कृष्णराज महाडिक यांच्या निवडीच्या निमित्ताने आली. कृष्णराज यांच्या निवडीच्या निमित्ताने या आठवणींना श्रीमती शकुंतला महाडिक यांनी उजाळा दिला. गेल्या ४ महिन्यात राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणावर उतरली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग निवडूनही आला आहे. त्यामुळे या युवा वर्गाचे राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची जबाबदारी खर्या अर्थाने युवा वर्गाचे आयड़ॉल असणार्या कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजपने सोपवली आहे, हेच त्यांच्या निवडीवरुन सिध्द होत आहे.
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचेआज रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने आज भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
ट्रायडंट ग्रूपची भारतभरातील भरती मोहिमेसह विकसित भारत मिशनसोबत वाटचाल
रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि राष्ट्र उभारणीवर सातत्याने भर देणाऱ्या या ग्रूपतर्फे ३००० हून अधिक कर्मयोगींची नियुक्ती होणार
कोल्हापूर —-ट्रायडंट लिमिटेड ही ट्रायडंट ग्रूपची मुख्य कंपनी आणि भाारतातील एक आघाडीचा उद्योग समूह आहे. या कंपनीने आपल्या उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरतीची प्रक्रिया जाहीर केली असून यातून ३००० हून अधिक कर्मयोगींना कामावर घेतले जाणार आहे. कापड उत्पादन क्षेत्रात कौशल्य विकासाला बळकटी आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या राष्ट्रीय धोरणाला अनुसरून ही भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
या घोषणेबद्दल ट्रायडंट ग्रूपच्या ग्रूप सीएचआरओ पूजा बी. लुथ्रा म्हणाल्या, “ट्रायडंटमध्ये आमचा ठाम विश्वास आहे की भारताच्या उत्पादन क्षेत्रातील बदलांचा पाया प्रतिभावान मनुष्यबळात आहे. या मोठ्या प्रमाणावरील भरती प्रक्रिया मोहिमेद्वारे आम्ही आमच्या मनुष्यबळाला बळकटी देत आहोत आणि त्याचवेळी लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज उत्पादन परिसंस्था निर्माण करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला हातभार लावत आहोत. व्यवसायवृद्धीपलिकडे दीर्घकालीन करिअर जोपासणे, समुदायांना बळकटी देणे आणि जागतिक उत्पादन नेतृत्व बनण्याच्या भारताच्या प्रवासात अर्थपूर्ण साह्य देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.”
या उपक्रमाचा भाग म्हणून ऑपरेटर, विणकर, शिवणकाम कारागीर, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि इतर कौशल्यांसोबतच विविध तांत्रिक आणि कार्यचलन जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव याआधारे निवड केली जाईल. विविध कौशल्य पात्रता आणि अनुभव यासाठी साजेशी अशी मानधन रचना ट्रायडंटने केली आहे. २-३ वर्षांपर्यंतचा अनुभव असणाऱ्या प्रोफेशनल्सना मासिक २५००० रु. मानधन दिले जाईल. तीन ते पाच वर्षांपर्यंतच्या अनुभवासाठी मासिक ३६००० रु. तर पाच ते सात वर्षांचा तज्ज्ञ अनुभव असलेल्यांना मासिक ५०००० रु. मानधन दिले जाणार आहे.
या स्पर्धात्मक पगारासोबतच कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह्स म्हणजे कामातील उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहने, व्हेरिएबल पे, रचनात्मक शिक्षण आणि विकास कार्यक्रम, मोफत हॉस्टेल, कमी दरातील खाद्यपदार्थ, क्रीडा आणि जीम सुविधांची सोय, वैद्यकीय साह्य, प्रॉव्हिडंट फंड आणि ईएसआय सुविधा तसेच विशिष्ट कालावधीने बक्षीस आणि सन्मान असे फायदेही कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ट्रायडंटने आपल्या धोरणात्मक प्रगतीचा मूळ भाग म्हणून मनुष्यबळातील गुंतवणूक कायम राखली आहे. सर्वसमावेशक प्रगती, आपल्या उत्पादन क्षमतांना बळकटी देणे आणि त्याचवेळी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा आणि करिअरमधील प्रगतीचाा मार्ग आखणे ही बांधिलकी या ग्रूपने कायम जपली आहे.
झी5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा प्रीमियर होणार
चित्रपटगृहात घवघवीत यश मिळवल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी या लोकप्रिय मराठी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार ~
कोल्हापूर: या वर्षाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी झी5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग व विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य धमाल यांची निर्मिती केलेला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा संवेदनशील सामाजिक विषयावरील चित्रपट आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचा आनंद, जिद्द, शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा गौरव या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. समकालीन आव्हानांना सामोरे जाताना आपली मुळे आणि ओळख जपणाऱ्या एका मराठी शाळेचा आणि या शाळेशी संबंधित माणसांचा भावनिक प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिनी या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार असल्यामुळे या प्रसंगाला अधिक अर्थ प्राप्त झाला आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आजही तितकेच कायम असल्याचा संदेश या निमित्ताने अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे.
सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी (मराठी चित्रपटातील पदार्पण), क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या मनाला भावला. आता डिजिटल प्रीमियरच्या माध्यमातून तो आणखी अनेकांना प्रेरणा देण्यासाठी सज्ज झाला आहे. सशक्त कथानक, प्रभावी अभिनय आणि मराठी माध्यम शिक्षणसंस्थांना दिलेली भावनिक मानवंदना यामुळे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 पासून केवळ मराठी झी5 वर पाहता येणार आहे.
चित्रपट मराठी झी5वर आणण्याबाबत झी मराठीच्या मुख्य चॅनल अधिकारी आणि मराठी झी5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. म्हणाल्या, “मराठी भाषा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पिढ्यान् पिढ्या चालत आलेली संस्कृती, ओळख आणि कथा सांगण्याची परंपरा जपणाऱ्या भाषेचा हा उत्सव आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या मराठी झी5वरील प्रदर्शानाच्या माध्यमातून, या राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत मराठी भाषा आणि मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करणारी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मान आम्हाला लाभत आहे. झी5मध्ये आमची बांधिलकी केवळ कंटेंट उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित नाही. मराठी प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत उत्कृष्ट कथा जाणून घेता येतील, अनुभवता येतील आणि त्यांच्याशी जोडता येईल, असे व्यासपीठ उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दिशेने आमचा ‘लँग्वेज पॅक’ उपक्रम हे महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे वापरकर्त्यांना मराठीत सहजपणे कंटेंट पाहता येतो आणि भाषा ही अडथळा न ठरता, दर्जेदार मनोरंजनापर्यंत पोहोचण्याचा दुवा ठरते. मराठी कंटेंट इकोसिस्टिम अधिक भक्कम करण्यासाठी आणि प्रेक्षकांना रुचतील अशा अर्थपूर्ण कथा सादर करण्यासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत.”
निर्माती आणि अभिनेत्री क्षिती जोग म्हणाल्या, “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची निर्मिती एका खोल भावनिक जाणीवेतून झाली आहे. एक निर्माती म्हणून मला नेहमीच असे वाटत आले आहे की सिनेमामध्ये संस्कृती जपण्याची, संवाद सुरू करण्याची आणि आपण कोण आहोत याची आठवण करून देण्याची ताकद आहे. हा चित्रपट अत्यंत प्रेमाने आणि या चित्रपटातून देण्यात आलेल्या संदेशावर असलेल्या ठाम विश्वासातून साकारण्यात आला आहे. मातृभाषेतील शिक्षण हे केवळ भाषेपुरते मर्यादित नसून ओळख, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक सातत्याशी जोडलेले आहे, हा त्याचा गाभा आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहांतून मराठी झी5सारख्या जागतिक व्यासपीठावर पोहोचताना पाहणे अत्यंत खास आहे. यामुळे ही कथा काय उपलब्ध असेल, नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या परंपरेचा अभिमान निर्माण करताना प्रादेशिक शिक्षणाच्या भविष्यासंदर्भातील वैचारिक संवादालाही चालना मिळेल, अशी मला आशा आहे.”
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पुढे सांगितले, “हा चित्रपट मराठी माध्यम शाळांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावनिक विश्वाचा उत्सव आहे. अभिमान, आपलेपणा आणि आपला भाषिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम भारावून टाकणारे होते. आता मराठी झी5च्या माध्यमातून असंख्य घरांपर्यंत आणि मनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.”
मुख्य अभिनेता सचिन खेडेकर म्हणाले, “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो आपल्या सामूहिक स्मृतींचे प्रतिबिंब आहे. आपल्यापैकी अनेकांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असून, त्या शाळांनी आपली मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडवले आहे. त्या परंपरेचा सन्मान करणाऱ्या या कथेत सहभागी होता आले, याचा मला मनापासून आनंद आहे. आता जगभरातील प्रेक्षकांना हा प्रवास मराठी झी5वर अनुभवता येणार आहे, याबद्दल मी विशेष उत्साहात आहे.”
अमेय वाघ म्हणाले, “या चित्रपटातील भावनिक सच्चेपणा आणि शांत व प्रभावीपणे मांडलेला संदेश मला खूप भावला. मराठी माध्यमाच्या शाळा या केवळ संस्था नसून, त्या मूल्य घडविणाऱ्या, आत्मविश्वासाची जोपासना आणि सांस्कृतिक ओळख मजबूत करणाऱ्या जागा आहेत. हा भावनिक संबंध चित्रपटात अतिशय सुंदररीत्या मांडण्यात आला आहे, तसेच आज या संस्थांना भेडसावणाऱ्या वास्तव अडचणींचाही वेध घेण्यात आला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक होता. डिजिटल प्रीमियरमुळे हा चित्रपट आणखी अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचेल आणि आपली भाषा जपणे, प्रगती स्वीकारणे आणि या दोहोंमध्ये समतोल साधणे याबाबत अर्थपूर्ण संवादाला चालना मिळेल, असा मला विश्वास आहे.”
मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना प्राजक्ता कोळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणे, हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि समाधान देणारा अनुभव ठरला आहे. मराठी ही माझ्या घरी बोलली जाणारी भाषा आहे. माझे बालपण, आठवणी आणि आपलेपणाची भावना या सगळ्याशी ही भाषा घट्ट जोडलेली आहे. मराठी कथाकथनात एक आपुलकी आणि प्रामाणिकपणा आहे, जो मनाला थेट भिडतो. इतका महत्त्वाचा आणि समकालीन आशय असलेल्या चित्रपटातून मी पहिले पाऊल टाकत आहे, याबद्दल मला विशेष कृतज्ञता वाटते. ओटीटीवरील प्रीमियरमुळे हा चित्रपट आता जगभरातील घराघरांपर्यंत पोहोचणार असून, स्वतःच्या आयुष्याची झलक ज्यात दिसते अशा प्रेक्षकांशी तो जोडला जाईल, याचा मला मनापासून आनंद आहे.”
27 फेब्रुवारी 2026 रोजी झी5वर होणारा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर चुकवू नका.

















