मुंबई, १ फेब्रुवारी २०२६ :भारतीय अर्थव्यवस्था येत्या दोन-तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनू शकते आणि त्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध आहेत. ब्रिटन, न्यूझिलंड, संयुक्त अरब अमिरात आणि युरोपीय महासंघासोबत झालेल्या व्यापारी करारांमुळे निर्यातवाढीस मोठा हातभार लागणार आहे. मात्र अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवणूक वाढवणे तसेच देशातील रीटेल क्षेत्राला चालना देण्यासाठी ताज्या केंद्रीय अर्थसंकल्पात अधिक ठोस उपाय अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया दुबईस्थित अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे अध्यक्ष व ‘मसालाकिंग’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करताना डॉ. दातार म्हणाले की, “भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी ताकद देण्याची क्षमता रीटेल क्षेत्रात आहे. मात्र या क्षेत्रात व्यावसायिकांची संख्या कमी असून उच्च करांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करणे कठीण जाते. सरकारने करांचे ओझे कमी करून अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतातील रीटेल क्षेत्रात थेट गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले की, “प्रचंड लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ असूनही भारतात रीटेल क्षेत्रात पुरेशा प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नाही. अनेक भारतीय परदेशात व्यवसाय करतात, पण देशात गुंतवणूक करण्यास पुढे येत नाहीत. एफडीआयला प्रोत्साहन आणि कर सवलती दिल्यास नव्या नोकऱ्या, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार, चांगले वेतन आणि स्पर्धेमुळे ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होतील.”
भारतातील रीटेल क्षेत्रात प्रचंड सुप्त सामर्थ्य असून आगामी काळ भारतासाठी अत्यंत आश्वासक असल्याचे नमूद करताना, काही वर्षांपूर्वी भारत हा ‘खरेदीदारांची बाजारपेठ’ होता, तर आज तो ‘विक्रेत्यांची बाजारपेठ’ बनला असल्याचेही डॉ. दातार यांनी स्पष्ट केले.
अनिवासी भारतीय व रीटेल क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी अर्थसंकल्पात ठोस उपाय अपेक्षित – मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
RELATED ARTICLES








