कोल्हापूर: तब्बल दीड किलो सोनं, अडीच ते तीन कोटी रुपये किंमत, मूळ तांब्याचा 200 किलो वजन असलेला तेरा फूट उंच सोन्याचा मुलामा असलेला कळस आज बसवल्याने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मुख्य शिखराला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. अधिक मासातील आज शुक्रवारी विधिवत पूजा करून हा सुवर्ण कळस बसवण्यात आला आहे. देशभरातून कोल्हापुरात दाखल झालेल्या लाखो भाविकांनी हा सुवर्णक्षण अनुभवला. लवकरच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने कलशारोहण सोहळा होणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देण्यात आली.
आदिशक्ती आई अंबाबाई चरणी देश-विदेशातून लाखो भाविक दान अर्पण करत असतात. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आई अंबाबाईला अर्पण केलेला सुवर्णकलश बसवण्याचं काम गुरुवारी मध्यरात्री हाती घेण्यात आलं होतं. 30 कारागिरांच्या सहाय्याने हे काम सुरू होतं. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुवर्ण कलश बसवून पूर्ण झाला. यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. अधिक मास आणि शुक्रवार असा दुहेरी योग शुक्रवारी जुळून आल्याने मंदिराच्या मुख्य शिखरावर सोन्याचा कळस आज बसवण्यात आला. हा कळस पाहण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. सध्या मंदिरात गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड पुनर्जीवित करण्याच्या कामासह विविध कामे सुरू आहेत. ही कामं पूर्ण झाल्यानंतर विधिवत कलशारोहण सोहळा पार पडेल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मावळते सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे.
मणिकर्णिका कुंड, गरुड मंडपाच्या कामाला गती – राज्य शासनाच्या वतीने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा उद्घाटन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्याचं नियोजन केलं जात आहे. याच अनुषंगाने अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड पुनर्जीवित करण्याच्या कामाला सध्या गती येत असून मंदिराचा मूळ आराखडा तसाच ठेवून अंबाबाई मंदिरात वरील पाच शिखरे, मंदिराच्या आतील नक्षीकाम करण्यात येत आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा मानस असल्याचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितलं.






