कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: सध्या युरोपात सुरु असलेले रशिया – युक्रेन युद्ध एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे युद्ध असून भारतासह जगभरावर त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत ‘आजादी का अमृत महोत्सव’ आणि शिवाजी विद्यापीठ हीरक महोत्सवानिमित्त राज्यशास्त्र विषयांतर्गत आयोजित “भारतातील बदलते राजकीय अंतरंग” या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘रशिया – युक्रेन युद्ध- भारतावरील परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. केंद्राचे संचालक डॉ. डी.के. मोरे अध्यक्षस्थानी होते, तर उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे, चंद्रकांत कोतमिरे प्रमुख उपस्थित होते.
डॉ.चौसाळकर म्हणाले, युरोपच्या भूमीवर ७५ वर्षानंतर प्रथमच युद्ध होत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघ निर्माण झाला. या युद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची ताकद मर्यादित झाली. नाटोसारख्या संघटनांमध्ये सामील झाल्यास हल्ला होणार नाही, ही भावना युक्रेनची होती. युएन वा नाटोचा युक्रेन सदस्य नव्हता, परंतु यातील सदस्य राष्ट्रांशी त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. तसेच, रशियाचे सत्ता सामर्थ्य वाढलेले होते. विस्तारवादाकडे रशियाचा कल होता. गेल्या २०-२२ वर्षांच्या कालखंडात पुतीन यांचे साम्राज्य वाढत होते. अशातच या युद्धामध्ये कुणीही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे बळी तो कान पिळी अशी अवस्था निर्माण झाली आहे.
डॉ. चौसाळकर म्हणाले, या युद्धाने जागतिक राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. पेट्रोल, इंधन, अत्याधुनिक शस्त्रास्रे आणि अन्नधान्य निर्यात यामुळे रशियाची अर्थ व्यवस्था सुरळीत सुरु होती. तसेच, या युद्धामध्ये युरोपातील अनेक देशांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. याचा भारतावर विशेष परिणाम होत आहे. जैव तेलाच्या किंमतीत वाढ होत असून महागाई वाढत आहे. भारतातील खाद्य तेलाच्या किंमती वाढत आहेत. या युद्धामुळे मनुष्य व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विस्थापितांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनानंतरच्या या युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत.
डॉ. एस.डी. भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. एस.एल. गायकवाड यांनी परिचय करून दिला. डॉ. पी.एन. देवळी यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ.नितीन रणदिवे यांनी आभार मानले.
