शेतकऱ्यांना आधार आणि सन्मान देण्याची गरज —आ.सुभाष देशमुख,
शेतकऱ्यांनी पिकाच्या उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करावे – पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग लाड, परभणी
शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता आणि त्यांच्या सन्मानासाठी प्रत्येक संस्था आणि राजकीय नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे. राज्यामध्ये समृद्ध शेतकऱ्यांचा एक समूह तयार केला, तर राज्य आणि देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. तरुणांनी शेती व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून शेतीचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी एक दिवस सोलापूर येथे येऊन आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची देखील त्यांनी विनंती केली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
लोकमंगल समूह आयोजित ,लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय पूरस्कृत लोकमंगल कृषी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी आमदार देशमुख हे बोलत होते. पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीरंग लाड परभणी (ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ) व सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विलास शिंदे (नाशिक )हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लोकमंगल कृषी पुरस्काराचे महत्त्व आणि नियोजन सांगितले यंदाचे हे प्रथम वर्ष असून, ज्या शेतकऱ्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्या सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देत त्यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि ही पुरस्काराची परंपरा यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी बोलताना पद्मश्री श्रीरंग लाड म्हणाले की, शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने पिकाची लागवड न करता आधुनिक पद्धतीने लागवड करून सतत देखभाल करणे गरजेचे आहे. कपाशीची लागवड केल्यानंतर त्या झाडाला किती फांद्या आहेत.? किती बोंड लागलेत.? त्याचे वजन किती? .त्यातून मिळणारा कापूस किती.? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जमिनीकडच्या बाजूला येणाऱ्या फांद्या कट केल्या तर झाडाच्या वरील इतर फांद्याच्या बोंडाचे वजन वाढते, पर्यायी उत्पादनामध्ये वाढ होते. एकरी पाच ते सहा क्विंटल कापूस निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये १२ ते १८ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. अशा छोट्या, छोट्या गोष्टीची दक्षता घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविणे गरजेचे असल्याचे मतही लाड यांनी व्यक्त केले.
यावळी नाशिकचे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे डॉ. विलास शिंदे, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र दहातोंडे, ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सचिन फुगे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजित कुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, संस्थेच्या सचिवा डॉ. अनिता ढोबळे, प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, प्राचार्य सागर महाजन प्राचार्य डॉ. राणी मेत्रे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. बाळासाहेब बिराजदार, अजित राठोड, सचिन परमशेट्टी, सलमान शेख, प्रथमेश बाळपुरी, संकेत बिराजदार व सर्व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
लोकमंगल प्रथम कृषी राज्यस्तरीय पुरस्काराचे थाटात वितरण
RELATED ARTICLES








