कोल्हापूर प्रतिनिधी : पती-पत्नीमधील वादाने अखेर रक्तरंजित वळण घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी (१६) सकाळी सुमारे दहाच्या सुमारास येथील योगेश्वरी कॉलनी परिसरात घडली. गणेश कदम याने पत्नी दिपाली गणेश कदम (वय 32.रा.योगेश्वर कॉलनी,पाचगाव) हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याने तिला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. या घटनेने योगेश्वर कॉलनी परिसरात एकच खळबळ उडाली.
दिपाली आणि गणेश यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समजते. या वादातूनच रविवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.आठ दिवसांपासून माहेरी; कपडे घेण्यासाठी सासरी आली.मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी पतीसोबत वाद झाल्यानंतर दिपाली शेजारीच असलेल्या माहेरी राहण्यासाठी गेली होती. रविवारी सकाळी ती आपल्या कपड्यांसह इतर वस्तू घेण्यासाठी गणेशच्या घरी आली होती. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली.
वाद वाढत गेल्यानंतर परिस्थिती हातघाईवर आली. याचदरम्यान गणेशने दिपालीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. दिपालीचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.करवीर पोलिसांचा घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांचे पथक तातडीने योगेश्वरी कॉलनीत दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून,पती गणेश कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचे स्वरूप आणि वादाची पार्श्वभूमी याबाबत पुढील तपास सुरू आहे.
दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याच्या संसाराचा अखेर वादातून झालेला हा दुर्दैवी अंत परिसरातील नागरिकांना हादरवून टाकणारा ठरला आहे.पोलिसांच्या तपासातून या हत्येमागील नेमके कारण आणि घटनेची अधिक माहिती समोर येणार आहे.
पोलिसांचा तपास सुरु असून या घटनेमुळे योगेश्वर कॉलनी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.






