कोल्हापूर /प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करून कर्जमाफी करण्याच्या निर्णयास काही कारणास्तव विलंब लागत असेल तर कर्जमाफी होईपर्यंत सरकारने सर्व थकीत कर्ज वसूलीस स्थगिती द्यावी अशी प्रमुख मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रदेश सचिव संजय पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिलयं.
निवेदनात म्हंटले आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच वचन शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी महाविकास आघाडीने दिलयं.शेतकरी हाच बहुसंख्य मतदार असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारनं प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची आपली घोषणा महत्त्वाची असून कोणत्याही कारणांमुळे याची अंमलबजावणी लांबणीवर पडत असेल तर कर्ज माफी होईपर्यंत सर्व थकीत कर्जाच्या वसुलीस सरकारनं स्थगिती द्यावी.शेतकऱ्यांची थकीत कर्जे विविध प्रकारची आहेत.शेती क्षेत्रातील विविध संकटामुळे शेतकऱ्यांची कर्ज थकीत पडली आहेत. या कर्जाच्या वसुलीसाठी सर्व बँका विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँका आणि गाव पातळीवरील सेवा सोसायटी वसुलीसाठी कार्यरत झाल्या असून तगादा लावत आहेत. तर वसुलीच्या नोटिसा शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर हप्ते थकले म्हणून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही. बँकांनी पीक कर्जाच्या कमाल मर्यादा पत्रकानुसार पीक कर्ज मंजूर केले असले तरी इतर कर्जाचे हप्ते थकल्याने मंजूर कर्जही शेतकऱ्यांना वितरित केली जात नाहीत.पिक कर्ज अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे ते अडकवून ठेवणे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक संकटात टाकणारे असून आत्महत्येस प्रवृत्त करणार आहे .त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी सर्व थकित कर्जाच्या वसुलीला तातडीने स्थगिती द्यावी व पीक कर्ज वितरित करण्याची व्यवस्था करावी या स्थगितीचा आदेश सर्व बँकांना तातडीने दिला जावा आदी मागण्या निवेदणाद्वारे करण्यात आल्या.